परभणी :(प्रतिनिधी ) 22 राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील नागरिकां पर्यंत पोहोचाव्यात म्हणून दि 24 एप्रिल 2022 रोजी पंचायत राज दिनी जिल्ह्यात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी दिली.
तसेच दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी बाल सभा घेण्यात येणार आहेत. शिक्षण विभागामार्फत शाळेमध्ये पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान उपक्रमांमध्ये केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केल्या आहेत त्यानुसार सन 2022 – 23 पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायतराज यंत्रणे मार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच सदर ग्रामसभा मध्ये ग्रामपंचायत स्थापनेचा दिवस निश्चित करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड वर याबाबतची माहिती प्रसिद्ध केल्या जाणार आहे.
दिनांक 24 एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायतराज दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी ग्रामसभेचे आयोजन करून गावाच्या विकासासाठी ग्रामसभेत विविध संकल्पांची निवड करण्यात येते. यावर्षी दिनांक 24 एप्रिल 2022 रोजी नऊ संकल्प ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या उपस्थितीमध्ये निवडण्यात येणार आहेत.
काय आहेत नऊ संकल्प
- सर्वांसाठी विकास, समृद्धी व शाश्वत उपजीविका उपलब्ध असेल असे गाव निर्माण करणे
- सर्व वयाच्या अबालवृद्धांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
- सर्व बालकांना जगण्याचा विकासाचा आणि संरक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणे.
- सर्व नागरिकांना वैयक्तिक नळजोडणी शाश्वत व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे.
- पर्यावरण पूरक गावाची निर्मिती करणे.
- सर्वांना परवडतील अशी घरे आणि मूलभूत सुविधा देणे.
- सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत सर्व पात्रताधारक लाभार्थ्यांना सामावून घेणे
- नागरिकांना विविध विकासाच्या योजनांचा लाभ देणे.
- महिला सक्षमीकरण व मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
देशभरातील विविध ग्रामपंचायती मधून झालेल्या चांगल्या कामांची माहिती इतर सर्व ग्रामपंचायतींना व्हावी या हेतूने दिनांक 11 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये दिल्ली येथे आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसभांच्या परिणामकारक संचलनासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतील उपक्रमांची माहिती व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टलच्या डॅशबोर्डवर अद्यावत करण्याचे अवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी केले आहे.