अतिवृष्टी’ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा जीआर निघाला, पैसे कधी मिळणार? कृषीमंत्र्यांनी सांगितली तारीख..
औरंगाबाद, : 9 सप्टेंबर : जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीच्या मदतीचा जीआर आज काढण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्ततार यांनी दिली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल, असंही सत्तार यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी म्हणता येईल, उद्या गणपतीचा विसर्जन आहे आणि त्यामुळे आज ही गोड बातमी मी देत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचलित दरापेक्षा जास्त रक्कम देण्यात येईल, असं या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,600 प्रती हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत.
ही रक्कम आधी 2 हेक्टरच्या मर्यादेत 6,800 रुपये प्रती हेक्टर एवढी होती. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत 27 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येतील. बागायतसाठीची आधीची रक्कम 2 हेक्टरच्या मर्यादेत 13,500 एवढी होती. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत 36 हजार रुपये देण्यात येतील.
ही रक्कम आधी 2 हेक्टरच्या मर्यादेत 18 हजार रुपये प्रती हेक्टर होती. 10 ऑगस्टला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या (NDRF) मोबदल्यापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर आता त्याचा जीआर काढण्यात आला आहे. दुप्पट भरपाईचा हा निर्णय धूळफेक करणारा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मत करण्याचा निर्णय फसवा आणि धुळफेक करणारा आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. एनडीआरएफच्या घटकांमध्ये अनेक घटकांचा समावेश नाही. शेतमजूर, व्यापारी, टपरीधारकांनाही मदत करण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी मांडलं. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झालेले असून दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार, बागायतीला दीड लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, तसंच 3 हेक्टरची मर्यादा शिथील केली गेली पाहिजे, अशा मागण्या अजित पवार यांनी केल्या होत्या.