महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमाची लढाई…

पुणे : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या पेशवा सैन्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. १८०० च्या दशकांत पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यांत मराठा साम्राज्य विभागलेले होते, त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई व पेशवा सैन्य अस्त झाला.
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे .
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते.