महाराष्ट्रसामाजिक

केतकी चितळेला जामीन नाहीच! कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; आजचा मुक्काम जेलमध्येच…

ठाणे, 18 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुक पोस्ट प्रकरणी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केतकीच्या जामीन अर्जाचा निर्णय राखीव ठेवला आहे. जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे केतकीला आता ठाण्यातील कारागृहात हलवण्यात आले आहे. केतकी चितळेवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचने अटक केली होती.

ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे क्राईम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.

यावेळी कोर्टाने निर्णय राखीव ठेवला आहे. आज जामीन अर्जावर सुनावणी अपूर्ण राहिली. तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायासाठी निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. पुढील सुनावणी तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्या अभिप्रायानंतर होणार आहे.

गुरुवारी सकाळी केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना देण्यात येणार आहे. दरम्यान, आज केतकीचा वैद्यकीय चाचणी जे जे हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. तिला फीट येण्याची तक्रार होती. गोरेगाव पोलिसांनी ताबा न घेतल्यामुळे केतकीचा आजचा मुक्काम ठाण्याच्या सेंट्रल जेलमध्ये असणार आहे.

केतकीला ‘तो’ मेसेज कुणी पाठवला, ती व्यक्ती कोण? दरम्यान, केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट टाकली त्याबद्दल सायबर सेलच्या मदतीने तपास केला जात आहे. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यता आहे.

यासाठी तिचा मोबाईल फॉरेन्सिक चाचणीकरता पाठवणार आहे. तसंच तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही २०२० ची पोस्ट तीने आता का केली याचा शोध घेतला जाणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती मात्र ती सोशल मीडिया सॅव्ही आहे. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती याचा पोलीस तपास करणार आहे.

कारण पोलिसांना संशय आहे की, केतकीला कोणा एका व्यक्तीनं अथवा ग्रुपने ती पोस्ट दिली आहे असा संशय आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत. केतकीची पोस्ट नेमकी काय आहे ? अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केतकीने ‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button